कंधारचा किल्ला

महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी कंधारचा किल्ला एक आहे. नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यात हा किल्ला आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास, सुरुवातीला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात केल्याचे समजते. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. पुढील काळात हा किल्ला जिंकणारे राजे या किल्ल्याच्या बांधकामात भर घालत गेले. कंधारचे पूर्वीचे नाव ‘पंचालपुरी’ असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे. मलिक अंबर यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण करुन त्या बांधल्या असल्याचे लक्षात येते. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात नसरत सुलतान याचे नाव आहे. हा शिलालेख इ.स. १३३६ सालातील आहे.

इ.स. १४०३ साली कंधार तुघलकाच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली होती. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदिलशहा याने बांधल्या असल्याचे समजते. या किल्ल्यावर सुंदर बगीचा होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख ‘बाग-ए-रश्के कश्मीर’ असा आहे.धनबुरुजावर ‘अंबारी’ नावाची तोफ आहे. पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. सुमारे १५ एकर जागेत असलेल्या या किल्ल्याभोवती खंदक आहे. या किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज आहे. अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत. कंधारच्या किल्याअसवर जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध आहेत. याशिवाय खासगी वाहनानेही जाता येते. किल्ल्याचे अंतर नांदेडहून ५० किलोमीटर एवढे आहे.