
भारतीय विवाह एक किंवा दोन दिवसांत संपणारा सोहळा नसून अनेक दिवस चालणारा कार्यक्रम आहे. लग्नाआधी हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ होतात. त्यानंतर विवाह व गाठीभेटींचा-शुभेच्छांचा सोहळा होतो. या सर्व समारंभापूर्वी वर आणि वधूला नवीन कुटुंबाशी चांगले नाते निर्माण करायचे असते. एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. तसेच अनेक नातेवाईकांकडे जावे लागते. असे एकमेकांच्या तसेच नातेवाईकांच्या घरी जाण्यापूर्वी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.
यातील बऱ्याच काही आपल्या वागण्याशी निगडीत असतात. लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या नातेवाईकाच्या घरी जात असाल तर तुमच्यासोबत काहीतरी घेऊन जा. रिकाम्या हाताने जाणे योग्य नाही. मिठाई हा सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय असला तरी, आपण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्यांना काहीतरी देऊ शकता. याचा अर्थ, जर घरी मुले असतील तर आपण त्यांना काहीतरी देऊ शकता. साहजिकच आहे की, कोणाच्या घरी गेल्यावर त्यांचे काम थोडे वाढते. अशा स्थितीत नुसते बोलण्यात गुंतून राहू नका. त्यांना त्यांच्या कामात मदतही करा. असे केल्याने केवळ काम जलद आणि सहजतेने पूर्ण करता येत नाही तर, तुमची प्रतिमाही सुधारते.
खाण्यापिण्यात प्रत्येकाची स्वतःची पसंती असते, पण जर एखादी गोष्ट तुमच्या आवडीची नसेल तर जुळवून घ्या. दुसरा उत्तम पर्याय म्हणजे बाहेरून एखादी वस्तू मागवणे हा आहे. पण त्याबद्दल उगाचच गडबड करू नका. नाहीतर इथे तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता वाढते. उगाचच फुशारक्या मारु नका. यावेळी आपपसात चर्चा होतात. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जाते. लक्षात घ्या, कोणाबद्दल वाईट बोलू नका. इथेही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. या फंदातच पडू नका. गॉसिपिंगची सवय कधीतरी अडचणीत आणू शकते. गरजेचे बोला, चांगले बोला. सकारात्मक रहा. कोणतीही गोष्ट आवडत नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करा; परंतु तोंड पाडून किंवा तोंड फुगवून बसू नका. आपली भेट नातेवाईकांसाठी संस्मरणीय असेल, अशा पद्धतीचे वर्तन कधीही चांगले !