संरक्षणमंत्र्यांचे जर्मनीच्या सुरक्षा समितीला संबोधन

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनी दौऱ्यादरम्यान भारत आणि जर्मनी यांच्यातील संरक्षण औद्योगिक सहकार्य अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना केवळ स्वदेशी उत्पादनापुरती मर्यादित नसून संयुक्त निर्मिती, संयुक्त विकास आणि नवोन्मेषासाठी जगाला दिलेले खुले आमंत्रण आहे. बर्लिन येथे जर्मन संसदीय संरक्षण आणि सुरक्षा समितीसमोर बोलताना त्यांनी या सहकार्याची गरज अधोरेखित केली.

राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्याच्या काळात जगासमोर नव्या प्रकारच्या सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तंत्रज्ञानातील झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आणि परस्परावलंबी झाली आहे. त्यामुळे अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विश्वासार्ह आणि मजबूत भागीदारी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या दौऱ्यादरम्यान भारत आणि जर्मनी यांच्यात संरक्षण उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. दोन्ही देश संयुक्त संशोधन, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासाच्या संधी शोधत असून, लष्करी क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची तयारी दर्शवत आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनीतील उद्योग क्षेत्रालाही भारतासोबत काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, भारतात संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आणि सहकार्य करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि मानवरहित प्रणाली यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये संयुक्त काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या तीन दिवसांच्या दौऱ्यामुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील रणनीतिक संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संरक्षण औद्योगिक सहकार्याच्या माध्यमातून दोन्ही देश जागतिक स्तरावर स्थैर्य, सुरक्षितता आणि प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करतील, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.






17,193 वेळा पाहिलं