
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात सिद्धक्षेत्र कुंथलगिरी हे एक धार्मिक क्षेत्र आहे. कुंथलगिरी हे ठिकाण उस्मानाबाद येथून सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर ६० किमी अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी बस तसेच खासगी वाहनांची सोय आहे. हा परिसर कुलभूषण व देशभूषण या मुनिवरांचे मोक्षस्थान समजला जातो. याठिकाणी श्री शांतीसागर महाराजांची समाधी आहे. येथे असलेल्या छोट्या डोंगराच्या टेकडीवर ७ मंदिरे असून पायथ्याशी 4 मंदिरे आहेत. टेकडीवर कुलभूषण-देशभूषण मंदिर, शांतीनाथ मंदिर, बाहुबली मंदिर, आदिनाथ मंदिर, अजितनाथ मंदिर, चैत्य, नंदीश्वर जिनालय ही मंदिरे आहेत. पायथ्याशी नेमिनाथजी, महावीरस्वामी, रत्नत्रय, समवसरण मंदिरे आहेत. येथे गुरुकुल देखील आहे.
दरवर्षी याठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेस वार्षिक जत्रा भरते. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी असते. हा एकूणच परिसर ऐतिहासिक आणि निसर्गरम्य आहे. येथे आलेले पर्यटक येथील अन्य ठिकाणांनाही भेटी देऊ शकतात. कुंथलगिरी येथून एक किलोमीटरवर रामकुंड हे गाव असून येथे रामाई देवीचे प्रसिध्द मंदिर आहे. येथून उस्मानाबाद लेणी 60 किमी. अंतरावर आहेत. तेर तीर्थक्षेत्र 60 किमी, पैठण – 140 किमी अंतरावर आहे. सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुंथलगिरीचा प्रसिध्द पेढा मिळतो. हे क्षेत्र बारा महिने सुरू असते. भाद्रपद शुद्ध पंचमी ते पौर्णिमा हा काळ ‘पर्यूषण पर्व’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वंदन केले जाते. हा परिसर मनमोहक व निसर्गरम्य आहे.