
भारत आणि केनिया या दोन्ही देशांमधील परस्पर व्यापार आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने संयुक्त व्यापार समितीची दहावी बैठक केनियाची राजधानी नैरोबी येथे पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्ही देशांनी आपापसातील संबंध अधिक दृढ करण्याचा आणि व्यापार वृद्धीसाठी नव्या संधी शोधण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. उभय देशांमधील व्यापार संबंध ऐतिहासिक आणि दीर्घकालीन असून, या चर्चेद्वारे त्यांना आधुनिक काळात एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या बैठकीचे सह-अध्यक्षस्थान भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल आणि केनियाच्या व्यापार राज्य विभागाचे प्रमुख सचिव रेजिना अकोटा ओम्बाम या अधिकाऱ्यांनी भूषवले. या प्रसंगी दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळांनी व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रातील विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली. विशेषतः व्यापाराच्या मार्गातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून परस्पर सहकार्य कसे वाढवता येईल, यावर या बैठकीत प्रामुख्याने भर देण्यात आला.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारामध्ये गेल्या काही काळात लक्षणीय वाढ झाल्याचे या बैठकीत विशेषत्वाने नमूद करण्यात आले. भारत हा केन्याचा एक प्रमुख व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात भारत आणि केनिया यांच्यातील एकूण व्यापार चार अब्ज एकतीस कोटी अमेरिकन डॉलर इतका होता, जो २०२४ -२५ या वर्षाच्या तुलनेत चोवीस पूर्णांक एक्याण्णव टक्क्यांनी वाढलेला आहे. व्यापाराचे वैविध्य वाढवणे, बाजारपेठेतील अडचणी दूर करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, औषधनिर्माण, शेती व विद्युत उपकरणे या क्षेत्रांमधील परस्पर पूरकतेचा लाभ घेणे यावर चर्चा केंद्रित होती.
बैठकीत अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये भारतीय मानक संस्था आणि केनिया मानक संस्था यांच्यातील एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार समाविष्ट आहे. याशिवाय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क केंद्रीय मंडळ तसेच केनिया महसूल प्राधिकरण यांच्यातही एक स्वतंत्र सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे भारत आणि केनियामधील व्यापारी प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे. यामुळे वस्तूंच्या आयात आणि निर्यातीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन ती जलद गतीने पूर्ण होईल, असा विश्वास दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केला.
दोन्ही पक्षांनी स्थानिक चलनात व्यापाराचे व्यवहार सोपवण्याच्या शक्यतेचीही दखल घेतली. स्थानिक चलनांत व्यापारी देणी-घेणी केल्यास दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना फायदा होईल, असे मत व्यक्त करण्यात आले. या दिशेने प्रयत्न करण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली.
या बैठकीच्या यशस्वी आयोजनामुळे भारत आणि केनिया यांनी भविष्यातील आर्थिक भागीदारीबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांनी शाश्वत विकास, मोठी गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला आहे. या संवादामुळे उभय देशांमधील राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक खोलवर रुजण्यास मदत होईल, अशी खात्री यावेळी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.