अंबरनाथमधील शिवमंदिर कात टाकणार

ठाण्यातील अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर आता कात टाकणार आहे. मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे १५० कोटींचा प्रकल्प राबविला जात आहे. या पुरातन मंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्याने पुरातत्व विभाग खडबडून जागा झाला असून मंदिराची झीज थांबविण्यासाठी काम सुरू केले आहे.

मंदिरावरील शिल्पांची झीज थांबविण्यासाठी सलाईनद्वारे केमिकलचा मारा केला जात आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यात शिल्प झिजणार नाहीत आणि ते आणखी टिकाऊ होतील, अशी माहिती मंदिरावर काम करणारे सीनियर मॉड्युलर सुधीर वाघ यांनी दिली आहे. अंबरनाथचे हे शिवमंदिर तब्बल ९६३ वर्षांचे आहे. इसवी सन १०६० मध्ये शिलाहार राजा मंबवाणी यांनी हे मंदिर बांधले होते. हे शिवमंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. या मंदिरावर अतिशय बारीक शिल्पे, देवतांच्या मूर्ती आहेत.

अंबरनाथचे हे शिवमंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. या मंदिराची युनेस्कोनेही दखल घेतली आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीत या मंदिराचा समावेश आहे. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला ‘वालधुनी नदीचा ओढा’ असे म्हटले जाते. या ठिकाणाचे मूळ नाव ‘आम्रनाथ’ असे होते. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे, असे सांगितले जाते. बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत.