आंबा फळ प्रक्रिया

आंबा फळ प्रक्रिया उद्योग हा विशेषत: कोकणातील एक उद्योग आहे. येथे या उद्योगाचे प्रमाण जास्त नाही; परंतु या उत्पादनांना मोठी मागणी आहे. हे फळ ठराविक हंगामातच येत असल्यामुळे त्याची बाजारामधील उपलब्धता एकाच वेळी अधिक प्रमाणात वाढते. अशा वेळी त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. शिवाय, ही फळे नाशिवंत असल्यामुळे ती अधिक काळ टिकू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून आंब्याची चटणी, कैरीचे पन्हे, आंब्याचा जॅम, आमचूर, आंब्यांचा सिरप इत्यादी पदार्थ बनविले जातात. महाराष्ट्रातील कोकण विभागात हापूस आंबा हे महत्त्वाचे फळपीक आहे. आंब्याची मधुरता, विशिष्ट असा स्वाद, रंग, चव व टिकाऊपणा यामुळे या आंब्याला देशासह जगभरातही मोठी मागणी आहे. आंब्याची वाहतूक करताना, आंबा तोडताना, साठवणूक करताना आंब्याचे बरेच नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आंब्याचा गर काढून त्याला कॅनिंग व पॅकेजिंग करता येते.
आंबा तोडणी किंवा साठवणीनंतर प्रक्रिया करण्यापूर्वी फळे स्वच्छ धुणे व त्यांचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. याकरिता यंत्राद्वारे फळे धुतली जातात. फळांवरुन नोझलच्या सहाय्याने पाण्याची फवारणी केली जाते. त्यामुळे फळावरील धूळ, डाग, रासायनिक अवशेष निघून जातात. फळे स्वच्छ करणारे यंत्र संपूर्णपणे स्टेनलेस स्टिलचे असते. यंत्राचे वजन हे ९०-११० किलो असून यंत्रांमध्ये ३०० लीटर पाणी साठवता येते. या यंत्राची क्षमता ही १०० किलो फळ प्रति तास इतकी आहे. या यंत्राला २४० व्होल्ट विजेची आवश्यकता असते. त्याला १ अश्वशक्ती विद्यूत मोटर जोडलेली असते. यंत्राचा आकार हा ५ फूट बाय २ फूट एवढा असतो. या यंत्राला चाके असल्याने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहजतेने नेता येते. धुतलेले व स्वच्छ केलेले आंबे कटींग टेबलपर्यंत नेता येतात. या यंत्राचा वापर अन्य फळांच्या स्वच्छतेसाठीही होऊ शकतो.
कटिंग टेबलवर चाकूने आंबा कापला जातो. अर्थात हा आंबा कच्चा असतो. याला कैरी असेही म्हणतात. कैरीची साल व कोय (फळातील बी) वेगळी करून तुकडे केले जातात. स्टेनलेस स्टिलपासून बनवलेल्या टेबलच्या वरील बाजूला फूड ग्रेड स्टीलचे कोटींग असते. या टेबलवर एका वेळेला ४ कामगार काम करू शकतात. या टेबलची किंमत अंदाजे २५ ते ३० हजार रूपये आहे. पिकलेल्या आंब्याचा रस काढण्यासाठी फळातून घट्ट रस काढण्याचे यंत्र (पल्पर) बाजारात उपलब्ध आहे. या यंत्राचा उपयोग आंब्याचा घट्ट रस काढण्यासाठी केला जातो. तुकडे केलेले आंबे या यंत्रामध्ये टाकले जातात. यंत्रामध्ये आवश्यक द्रव्य आणि इच्छित पदार्थाचे प्रमाण यानुसार जाळी लावलेली असते. त्यातून रस निघाल्यानंतर उर्वरित चोथा बाहेर टाकला जातो. आंब्याचा रस हा कंटेनरमध्ये साठवला जातो.
आंब्याच्या गराला बाजारात खूप मागणी असते. वेगवेगळे मिठाई उद्योग, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ उद्योग, बेकरी व चॉकलेट उद्योग, औषध उद्योगामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. रसवंती गृह, आइस्क्रीम सेंटर येथेही नैसर्गिक स्वादासाठी आंबा गर वापरला जातो. आंबा गर काढण्यासाठी विविध यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पूर्णपणे स्टेनलेस स्टीलच्या बनवलेल्या या यंत्राचे वजन ७० किलो आहे. यंत्राला ०.५ अश्वशक्तीची विद्युत मोटर जोडलेली असते. या यंत्रामध्ये प्रति तास ५० किलो रस तयार होतो. हे विद्युत यंत्र वापरायला सोपे आहे. भारतातून होणाऱ्या एकूण फळांच्या आणि फळप्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीत आंब्याचा वाटा ६० टक्के इतका आहे. आंब्यापासूनच्या पदार्थ निर्यातीला भरपूर वाव आहे.