एव्हरेस्टवरील पूर इशारा यंत्रणा निकामी

माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवाला आता निसर्गापेक्षा मानवी दुर्लक्षामुळे धोका निर्माण झाला आहे. हिमनद्या वितळून येणाऱ्या महापुराची पूर्वसूचना देण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करून बसवण्यात आलेली अत्याधुनिक यंत्रणा देखभालीअभावी गंजत पडली आहे. ही धक्कादायक माहिती नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालातून उघड झाली आहे.

हिमालयीन क्षेत्रात हवामान बदलामुळे हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. यामुळे हिमनद्यांच्या पायथ्याशी विस्तीर्ण तलाव तयार झाले आहेत. इम्जासारखे हिमतलाव कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती असते. जर असा तलाव फुटला, तर खालच्या भागात असलेल्या सोलुखुंबू परिसरातील हजारो गावे आणि तेथील रहिवासी काही मिनिटांत वाहून जाऊ शकतात. यालाच हिमनदीजन्य सरोवर पूर असे म्हणतात. काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि नेपाळ सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुमारे सात दशलक्ष डॉलर्स खर्च करून एक अत्याधुनिक पूर्वसूचना यंत्रणा बसवण्यात आली होती. यामध्ये संवेदक, सायरन आणि उपग्रह संदेशवहन यंत्रणेचा समावेश होता. तलावाची पाणी पातळी वाढताच खालच्या गावांमध्ये आपत्कालीन सायरन वाजणे अपेक्षित होते. मात्र, आज ही यंत्रणा केवळ कागदावरच जिवंत उरली आहे. सध्या ही यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली असून तिचे सुटे भाग गंजले आहेत. अनेक ठिकाणी संवेदक तुटले आहेत तर सौर ऊर्जा पट्टी धुळीने माखले आहेत. या यंत्रणेच्या देखभालीसाठी लागणारा निधी आणि स्थानिक प्रशासनाकडे असलेल्या तांत्रिक कौशल्याचा अभाव यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. एकेकाळी सुरक्षेचे कवच वाटणारी ही यंत्रणा आता डोंगरावरील कचरा बनली आहे.

एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या खुंबू खोऱ्यात शेकडो गावे असून तिथे हजारो स्थानिक नागरिक आणि दरवर्षी येणारे लाखो पर्यटक वास्तव्यास असतात. जर अचानक पूर आला, तर त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी केवळ दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ मिळेल. पूर्वसूचना देणारी यंत्रणाच बंद असल्याने लोकांपर्यंत हा संदेश पोहोचणे अशक्य आहे. स्थानिक नागरिकांनी सरकारकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. वैज्ञानिक अभ्यासानुसार, हिमालयातील हिमनद्या वितळण्याचा वेग पूर्वीपेक्षा दुप्पट झाला आहे. केवळ नेपाळच नव्हे, तर भारत, भूतान आणि पाकिस्तानमधील हिमालयीन क्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे. २०१३ ची केदारनाथ दुर्घटना किंवा २०२१ मधील चमोलीतील पूर यांसारख्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा वेळी पूर्वसूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित असणे ही चैन नसून ती गरज आहे. तज्ज्ञांच्या मते, केवळ यंत्रणा बसवणे पुरेसे नाही, तर तिच्या देखभालीसाठी स्थानिक समुदायाला प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. गंजलेली यंत्रणा बदलून नवीन सेन्सर्स बसवणे आवश्यक आहे. देखभालीसाठी वार्षिक बजेटमध्ये तरतूद हवी. स्थानिक शेर्पा आणि रहिवाशांना यंत्रणेच्या वापराचे प्रशिक्षण देणे. हवामान बदलाचे संकट जागतिक असल्याने विकसित देशांनी अशा यंत्रणांच्या देखभालीसाठी मदत करणे गरजेचे आहे.






11,896 वेळा पाहिलं