एका आठवड्यात बावन्न हजारांहून अधिक भारतीय सुरक्षित मायदेशी परतले

आखाती देशांतील अस्थिर परिस्थितीचा मोठा फटका आखाती देशांत प्रवासासाठी गेलेल्या आणि तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बसला होता. मात्र, भारत सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करत, एक मार्च ते सात मार्च या सात दिवसांच्या कालावधीत बावन्न हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

युद्धामुळे आखाती देशांतील हवाई वाहतूक काही दिवसांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत या क्षेत्रातील हवाई हद्द अंशतः उघडण्यात यश आले आहे. या संधीचा फायदा घेत भारत सरकारने तातडीने व्यावसायिक विमाने आणि काही विशेष बिगर-अनुसूची विमाने कार्यान्वित केली. या प्रयत्नांमुळे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतणे शक्य झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावन्न हजारांपैकी बत्तीस हजार एकशे सात प्रवाशांनी भारतीय विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास केला, तर उर्वरित नागरिकांनी परदेशी एअरलाइन्सचा वापर करून सुरक्षितपणे भारताचा रस्ता धरला. आगामी दिवसांत आणखी काही विशेष विमाने नियोजित करण्यात आली असून, जे नागरिक अजूनही तिथे अडकलेले आहेत किंवा ज्यांना तातडीने परतण्याची गरज आहे, त्यांना मदत केली जात आहे.

भारत सरकार या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विशेषतः, ट्रान्झिटमध्ये असलेले किंवा अल्प कालावधीच्या भेटीसाठी गेलेले भारतीय नागरिक, जे युद्धामुळे तिथे अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने खालील पावले उचलली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीत एक’विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यरत असून बाधित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शंकांचे निरसन करत आहे. त्या-त्या देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी चोवीस तास हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. अडकलेल्या नागरिकांना जवळच्या विमानतळांच्या उपलब्धतेबद्दल आणि प्रवासाच्या पर्यायांबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. भारतीय नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आणि भारतीय दूतावासाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या देशांमध्ये अद्याप व्यावसायिक विमान सेवा सुरू झालेली नाही किंवा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना थेट संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाचे अधिकारी त्यांना जवळच्या उपलब्ध विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
21,332 वेळा पाहिलं